महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या श्री क्षेत्र जेजुरी येथील जेजुरी गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा जाहीर...
जेजुरी हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात असलेल्या पुरंदर तालुक्यातील एक सर्वात महत्वाचे धार्मिक क्षेत्र आहे. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेल्या आणि काळाच्या ओघात जेजुरी या नावाने नावारुपाला आलेल्या या गावात साक्षात शिवाचा अवतार मल्हारी मार्तंड येथे नांदतो. श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण करून दक्षिणमध्ये मणि आणि मल्लाचा संहार केल्यानंतर आपली राजधानी येथे स्थापन केली. ज्या ठिकाणी शिव शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण करून मणि आणि मल्ल या राक्षसांवर अभूतपूर्व जय मिळवला त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगेच्या या डोंगररांगांना जयाद्री हे नाव लाभले असावे.
या मार्तंड भैरवास हळद खुप आवडते. या हळदीला ग्रामीण बोलीभाषेत भंडारा असे संबोधतात. आपल्या देवाला प्रिय असणार हा भंडारा इथे येणारा प्रत्येक श्रद्धालु, भाविक मोठ्या भक्तिभावाने, मोठ्या आनंदाने उंच गगनात उधळत असतो. हर्षाने, मोठ्या श्रद्धेने उधळलेल्या ह्या भंडाऱ्यामुळे या नगरीचा सर्व परिसर हा सुवर्णमय होतो! ५२ कशी सोन्यासारखा दिसतो. म्हणूनच तर जेजुरी सोन्याची नगरी.. हे लोकउद्गार आहे.
खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत! विविध धर्म, पंथ, संप्रदाय, अठरापगड जाती, बारा बलुत्यातील कुळांचे कुलदैवत. महाराष्ट्राप्रमाणे हा लोकदेव कर्नाटक,आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावाने पुजला जातो. भेदाभेदाच्या सर्व चौकटी नष्ट करून सगळ्या जाती, धर्म, पंथ, संप्रदाय, प्रांत, प्रदेश, बोली, भाषांना, गरीब, श्रीमंत या सर्वांना आपलंस करणारा हा खरा लोकदेव. सर्वसमावेशक असणारा सर्वाचा हा लाडका देव महाराष्ट्रात खंडोबा, खंडेराव, खंडेराय, मल्हारी, मार्तंड, मार्तंड भैरव, म्हाळसाकांत या नावाने ओळखला जातो. तर कर्नाटक या राज्यात मैलार आणि आंधप्रदेशामध्ये मल्लाण्णा या नावाने अर्चीला जातो.
जेजुरी पुणे शहरापासून साधारणपणे अंदाजे ५० किलोमीटर अंतरावर स्थित आहे. येथे पोहोचण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्या बस सेवा नियमित आहे. गावालगतच काही अंतरावर रेल्वे स्टेशन असून जेजूरीत येण्यासाठी चांगले महामार्ग, रस्ते उपलब्ध आहेत. जेजुरी हे गाव विशेषत पुणे-पंढरपूर ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर येते. लवकरच जेजुरीजवळ पुरंदर विमानतळ प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे.
पुरंदर तालुका हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. पुरंदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. येथेच शिवाजी महाराजांनी मुघलांशी तह केला होता. पुरंदर तालुक्यातील सासवड हे गाव ऐतिहासिक मंदिरे, समाधी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच, पुरंदर तालुका कृषी क्षेत्रासाठीही ओळखला जातो. येथे अंजीर, सीताफळ, डाळिंब, द्राक्षे आणि भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.
सन्माननीय वापरकर्ता,
आपण या संकेतस्थळाचे गेले नऊ-दहा वर्ष नियमित वापरकर्ता आहात . जर आपल्याला या संकेतस्थळासंदर्भात काही अभिप्राय नोंदवायचे असल्यास आपण ते निसनकोचपणे नोंदवू शकता. आपण या संकेतस्थळाच्या वापराच्या अनुभवाबद्दल आमच्याशी बोलू शकता. यामुळे आपल्या आवडत्या संकेतस्थळाची रचना आणि वापरकर्ता अनुकूलता यामध्ये भर घालण्यास मदत होईल.