महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या श्री क्षेत्र जेजुरी येथील जेजुरी गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा जाहीर...
जेजुरी हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक अत्यंत महत्त्वाचे धार्मिक क्षेत्र आहे. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले आणि काळाच्या ओघात ‘जेजुरी’ या नावाने नावारूपाला आलेले हे गाव, शिवाचा अवतार मल्हारी मार्तंड येथे नांदत आहे. श्री शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण करून दक्षिणेकडे मणि आणि मल्ल या राक्षसांचा संहार केल्यानंतर आपली राजधानी येथे स्थापन केली. ज्या ठिकाणी शिवशंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण करून मणि आणि मल्ल या राक्षसांवर अभूतपूर्व विजय मिळवला, त्यामुळे त्या ठिकाणाला म्हणजेच सह्याद्री पर्वतरांगेतील या डोंगररांगांना ‘जयाद्री’ हे नाव लाभले असावे.
या मार्तंड भैरवाला हळद खूप आवडते. या हळदीला ग्रामीण बोलीभाषेत ‘भंडारा’ असे संबोधले जाते. आपल्या देवाला प्रिय असणारा हा भंडारा, इथे येणारा प्रत्येक श्रद्धाळू व भाविक मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने उंच गगनात उधळत असतो. हर्षाने व श्रद्धेने उधळलेल्या या भंडाऱ्यामुळे या नगरीचा संपूर्ण परिसर सुवर्णमय होतो! सारा प्रदेश जणू ‘बावनकशी’ सोन्यासारखा भासतो. म्हणूनच तर "जेजुरी – सोन्याची नगरी!" हे लोकउद्गार ऐकू येतात.
खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत! विविध धर्म, पंथ, संप्रदाय, अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांच्या कुळांचे हे कुलदैवत आहे. महाराष्ट्राप्रमाणेच हा लोकदेव कर्नाटक व आंध्रप्रदेशातही वेगवेगळ्या नावांनी पूजला जातो. भेदाभेदाच्या सर्व चौकटी पार करत, सर्व जाती, धर्म, पंथ, संप्रदाय, प्रांत, प्रदेश, बोली, भाषा, गरीब-श्रीमंत या सर्वांना आपलंसं करणारा खरा लोकदेव म्हणजे खंडोबा! सर्वसमावेशक असणारा, सर्वांचा लाडका हा देव महाराष्ट्रात खंडोबा, खंडेराव, खंडेराय, मल्हारी, मार्तंड, मार्तंड भैरव, म्हाळसाकांत या नावांनी ओळखला जातो. तर कर्नाटक राज्यात मैलार’ आणि आंध्रप्रदेशात ‘मल्लाण्णा’ या नावाने त्याची पूजा केली जाते.
जेजुरी हे पुणे शहरापासून साधारणतः ५० किलोमीटर अंतरावर स्थित आहे. येथे पोहोचण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) यांच्या बस सेवा नियमितपणे उपलब्ध आहेत. गावालगत काही अंतरावर रेल्वे स्थानक असून, जेजुरीमध्ये येण्यासाठी चांगले महामार्ग व रस्त्यांची सुविधा आहे. जेजुरी हे गाव विशेषतः पुणे–पंढरपूर ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वसलेले आहे. लवकरच जेजुरीजवळ पुरंदर विमानतळ प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.
पुरंदर तालुका हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. पुरंदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी मुघलांशी तह केला होता. पुरंदर तालुक्यातील सासवड हे गाव ऐतिहासिक मंदिरे व समाधी स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच, पुरंदर तालुका कृषी क्षेत्रासाठीही प्रसिद्ध आहे. येथे अंजीर, सीताफळ, डाळिंब, द्राक्षे आणि भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.
सन्माननीय वापरकर्ता,
आपण या संकेतस्थळाचा गेल्या नऊ-दहा वर्षांपासून नियमित वापर करत आहात. आपल्याला या संकेतस्थळासंदर्भात काही अभिप्राय द्यायचा असल्यास, कृपया तो निसंकोचपणे नोंदवा. आपण या संकेतस्थळाच्या वापराबाबत आपल्या अनुभवांविषयी आमच्याशी मुक्तपणे बोलू शकता. आपला अभिप्राय आम्हाला संकेतस्थळाची रचना आणि वापरकर्ता अनुकूलता यामध्ये अधिक सुधारणा करण्यास मदत करेल.